मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात गोवरच्या साथीने हाहाकार माजवला आहे. गोवरचे संकट आहेच, पण ज्या पद्धतीने चीनमध्ये कोरोना पसरला आहे ते पाहता महाराष्ट्राला सावधान राहायला हवे. कोरोना काळात तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे हे लोकांशी संवाद साधून माहिती देत होते. इस्पितळात व कोविड केंद्रांना भेटी देत होते, पण आज मुंबई-महाराष्ट्र गोवर साथीच्या विळख्यात सापडला असताना ‘आरोग्यमंत्री तानाजी सावंत दाखवा व एक लाख रुपये मिळवा’ असे जाहीर करावे लागणे हे राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे, अशी जोरदार टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे.

गोवरची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने रुग्णांची संख्या वाढू शकते. कोरोनाप्रमाणेच हा आजार संपर्क व स्पर्शातून पुढे जाऊ शकतो. ते टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार, आरोग्य मंत्रालयाने कोणती पाऊले उचलली आहेत? लसीकरण वगैरे वाढविण्याचे बोलले जात आहे, पण ते सर्व कागदावरच दिसतेय. गोवरसंदर्भात दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होऊन गोवरच्या साथीचा आढावा घेण्यात आला. गोवरसंदर्भात मार्गदर्शक नियमावली महाराष्ट्र राज्यासाठी जारी केली गेली. त्या नियमावलीचा अभ्यास सर्वप्रथम राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी करायला हवा. महाराष्ट्राच्या नशिबी या संकटकाळात बेजबाबदार आरोग्यमंत्री आला. त्यास परिस्थितीचे गांभीर्य माहीत नाही. त्यामुळे संकटाची तीव्रता जास्त आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

गोवर आणि कोरोनाच्या बातम्या चिंता वाढविणाऱ्या आहेत. मुंबईसह राज्यभरात गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या दहा हजारांवर गेली. त्यातले सर्वाधिक ‘गोवर’ रुग्ण मुंबई शहरात आहेत. चीनमध्ये रविवारी एकाच दिवशी कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे चीन सरकारने पुन्हा ‘लॉकडाऊन’सारखे कडक निर्बंध लागू केले. या लॉकडाऊनच्या विरोधात चीनमध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने सुरू झाली आहेत. चीनच्या रस्त्यांवर पोलीस विरुद्ध विद्यार्थी, जनता असा संघर्ष सुरू आहे व त्याची दखल भारताने घ्यायला हवी.