कागल (प्रतिनिधी) : कागल येथे छ. शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बसस्थानकाजवळील छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला.

सकाळी अकरा वाजता शहराच्या मुख्य बाजारपेठेतून सवाद्य मिरवणूक निघाली. शिवज्योत घेऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, नगराध्यक्ष सौ. माणिक माळी, केडीसीसी बँकेचे संचालक भय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीवर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव होत होता. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी’ या घोषणांच्या निनादात गैबी चौकातून निघालेली ही मिरवणूक पुढे पोलीस स्थानक,  खर्डेकर चौक, कोल्हापूर वेश कमानीतून  महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यापर्यंत आली. ना. हसन मुश्रीफ आणि नगराध्यक्ष माळी यांच्या हस्ते पुतळ्यावर दुग्धाभिषेक, जलाभिषेक करण्यात आला.

यावेळी ना. मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीची जिवाभावाची माणसं जमा केली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी चालवायचं असतं याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. त्यांनी त्या काळात काढलेले वटहुकूम, खलिते आजही राज्यकारभार चालवताना प्रमाण मानले जातात.

यावेळी रमेश माळी, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, प्रविण काळबर, नितीन दिंडे, सतीश घाडगे, सौरभ पाटील, विवेक लोटे, आनंदा पसारे, विकास पाटील, मुख्याधिकारी पंडीत पाटील, अलका मर्दाने, यांचेसह पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.