कोल्हापूर (प्रतिनिधी) :  छत्रपती शिवाजी महाराजांची इंग्लंडमध्ये असलेली जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत आणावी, या प्रमुख मागणीसाठी शिवदुर्ग संवर्धन आंदोलन संघटनेने  गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलन सुरू आहे. मात्र, राज्य व केंद्र शासनाने याकडं दुर्लक्ष केल्यानं शिवभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील शिवभक्तांनी आक्रमक होत पन्हाळागडावर आज (सोमवार) ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

पन्हाळगडावरील शिवाजी महाराजांच्या मंदिरात पूजा करून शिवभक्तांनी थेट सज्जाकोठी गाठला. आणि ठिय्या मांडत सरकारविरोधात जोरदार निदर्शनं केली.  दरम्यान जोपर्यंत शासनाकडून जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी कार्यवाही होऊन लेखी आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत सज्जाकोठीवरुन हलणार नाही. वेळ पडल्यास टोकाची भूमिका घेऊ, असा इशारा या वेळी शिवभक्त हर्षल सुर्वे यांनी दिला आहे.