सातारा (प्रतिनिधी) : ‘खासदार संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही. तर शरद पवार जे बोलतात ते कधीच खरे ठरत नाही.’ असे म्हणत माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दोन्ही दिग्गज नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. 

राज्यामध्ये बंड झाल्यानंतर या बडांमध्ये शंभूराज देसाई यांनी शिवसेनेची फारकत घेत शिंदे गटांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या पंधरा-वीस दिवसांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आज (बुधवारी) आमदार शंभूराजे देसाई हे साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधत आपण शिवसेनेतून शिंदे गटामध्ये सामील का झालो याबद्दलच्या अनेक घटना सांगितल्या.

खासदार संजय राऊत यांनी पक्षांमध्ये वेळोवेळी केलेली ढवळाढवळ आणि आमदारांना दिलेली दुजाभावची वागणूक याच घटनेला विरोध करत ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. संजय राऊत यांनी प्रत्येक बंडखोर आमदाराला ५० कोटी देण्यात आल्याचा आरोप देखील केला होता. याच आरोपाला उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, पैसे घेतल्याचा पुरावा द्यावा राजकारण सोडून घरी बसेन. म्हणून आम्ही संजय राऊतांच्या कोणत्याही वक्तव्याला जास्त किंमत देत नाही.