कोतोली (प्रतिनिधी) :  मुंबई येथील विलेपार्ले शिवसेना शाखेच्या वतीने पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील पूरग्रस्त गावांना सुमारे एक हजार अन्न-धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामध्ये शेतकरी आणि नागरीकांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ग्रामीण भागातील गावांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये घरांची पडझड, अन्नधान्य आणि प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील काही पूरग्रस्तांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही.

याचाच एक भाग म्हणून मुंबई विलेपार्ले येथील शिवसेना शाखेच्या वतीने आज (शुक्रवार) अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील सरुड गावाला चारशे तर पन्हाळा तालुक्यातील तेलवे, कोलोली, तिरपण, दिगवडे आदी गावांमधील पूरग्रस्तांना सुमारे सहाशे किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी मुंबई विलेपार्ले शिवसेना शाखाध्यक्ष विजय मेंगाने, संभाजी जाधव, जनसुराज्यचे सरदार जाधव, नंदु जाधव, रणजीत सरनोबत, सुभाष मेंगाणे, भगवान माने, सरदार जाधव, रमेश जाधव, बबन चौगुले आदी उपस्थित होते.