कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशात ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ चा नारा दिला जात असताना भाजपची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशात ‘बेटी भगाओ, बेटी जलाओ’ सारखी अमानवी कृत्ये घडत आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात महिलांवरील अत्याच्यारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पिडीतेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचे काम उत्तरप्रदेश सरकार कडून होत आहे. त्यामुळे बलात्कारातील आरोपीना पाठीशी घालणारी बीजेपी म्हणजेच ‘बेटी जलाओ पार्टी’चे उत्तरप्रदेशातील सरकार बरखास्त करावे, आरोपींना फाशी व्हावी, आणि पिडीत दलित युवतीच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ आज (मंगळवार) कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करण्यात आली.

यावेळी ‘बलात्काऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो’, ‘बरखास्त करा, बरखास्त करा’, उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करा’, ‘राजीनामा द्या, राजीनामा द्या.. योगी आदित्यनाथ राजीनामा द्या’, अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला. यानंतर हाथरस प्रकरणातील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेच्या वतीने दहन करण्यात आले.

यावेळी बोलताना संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी, पिडीतेला न्याय देण्याऐवजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे अघोरी कृत्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने केले आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री खरोखरच साधू आहेत की साधुपणाचा ढोंग करणारे अंधभक्त? असा सवाल उपस्थित होत असल्याचे सांगत उत्तरप्रदेशवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख रवीभाऊ चौगुले, माजी विभागप्रमुख दीपक गौड यांनीही मनोगते व्यक्त केली. या वेळी शिवसेना कोल्हापूर शहर महिला आघाडीच्या शहरप्रमुख मंगलताई साळोखे, माजी शहरप्रमुख पूजाताई भोर, मंगलताई कुलकर्णी, रुपाली कवाळे, पूजा कामते, शाहीन काझी, सुनिता भोपळे, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, फेरीवाले सेना शहरप्रमुख धनाजी दळवी, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.