कोल्हापूर (प्रतिनिधी): आत्महत्याग्रस्त तरुणीचे फोटो संबंधित मंत्र्यासोबत प्रसिद्ध होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई का होत नाही ? आज जेंव्हा या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येत आहेत, तेंव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत ? असे अनेक प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियातून उपस्थित केले आहेत. नामोल्लख टाळत मंत्री राठोड प्रकरणी महाविकास आघाडीला त्यांनी लक्ष्य केले आहे.

पाटील यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हणतात, तरुणीच्या आत्महत्येचा आरोप असेलेले व लपून बसलेले राज्य सरकार मधील एक मंत्री आज १५ दिवसानंतर वाजतगाजत प्रकट होत आहेत. माध्यमांमध्ये दाखवत आहेत की कसे त्या मंत्र्यांचे समर्थक जल्लोष करत गाड्यांमधून मिरवणूक काढत आहेत. आज एका वृत वाहिनीवर त्या मंत्र्यांचे आत्महत्याग्रस्त तरुणी सोबतचे फोटो प्रसिद्ध होऊनही राज्य सरकारने अजूनही ढिम्मपणे बघ्याची भूमिका घेतली आहे. एवढे पुरावे समोर येऊनही अजून काय सिद्ध होण्याचे बाकी आहे ? राज्य सरकार त्या प्रकरणावर कोणताही गुन्हा नोंदवून घेण्यास का तयार नाही आहे ? सत्तेचा गैरवापर करून कायदा खिशात घालण्याची परिसीमा या ठाकरे सरकारने ओलांडली आहे. तुम्ही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे संरक्षण केले पाहिजे पण उलट तुम्ही तर एका आरोपीला वाचवत आहात . आत्महत्याग्रस्त तरुणीला न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे.