इचलकरंजी (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या निर्देशानुसार आज (बुधवार) पासून इचलकरंजी शहरातील पाचवी ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांची शाळा सुरु करण्यात आली.यावेळी पालकांचे संमतीपत्र, विद्यार्थ्यांची थर्मल चाचणी, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टसिंग याची पुरेपूर काळजी संबंधित शाळा व्यवस्थापनाकडून घेण्यात आली. बऱ्याच कालावधीनंतर शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

यावेळी व्यंकटराव हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक खोत यांनी शासनाचे सर्व निर्देश पाळून आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच अजूनही काही पालकांनी केवळ भितीपोटी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवले नाही.त्यामुळे अशा पालकांनी शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण दक्षता घेणार असून यावर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना शाळेत पाठवून सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.