कोल्हापूर (प्रतिनिधी) : मोदी सरकारने पारित केलेले कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात शेतकरी संघटनांनी शुक्रवार २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला काँग्रेसचा पाठिंबा असून काँग्रेसतर्फे संपूर्ण जिल्ह्यात उपोषण केले जाणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील,  शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण आजी, माजी आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, युवक काँग्रेस, एनएसयुआय, विविध सेलचे पदाधिकारी हे काँग्रेस कमिटीसमोर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत उपोषण करणार आहेत.

शेतक-यांना उद्धवस्त करणारे काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील ११० दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. परंतु हे कृषी कायदे मोदी सरकारने रद्द केले नाहीत. तसेच पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसवर भरमसाठ कर लावून केंद्र सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलिंडर ८५० रुपये झाला आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत. मोदी सरकारच्या या मनमानी व  हुकुमशाहीचा विरोध उपोषण करून केला जाणार असल्याचे ना. सतेज पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.