मुंबई (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये गेली अडीच वर्षे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत होते. आपण सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य कायम लक्षात राहील. आपले सहकार्य पुढेही असू द्या, म्हणत सतेज पाटील यांनी आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सतेज पाटील म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांचा विचार करीत महाविकास आघाडी सरकारमध्ये कार्यरत असताना जे लोकहिताचे निर्णय आम्ही घेऊ शकलो यामध्ये आपणा सर्वांचे प्रत्यक्ष- प्रत्यक्षपणे योगदान राहिलेलं आहे.

महाविकास आघाडीमध्ये गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर सतेज पाटील यांनी आपल्या कार्यालयातील सहकाऱ्यांचा निरोप घेतला. या सर्वांसाठी पाटील यांनी अल्पोपहाराचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी, त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची भेट घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी, खाजगी सचिव, विशेष कार्य अधिकारी, स्वीय सहायक, पोलीस स्टाफ यांचे पासून शिपाई, स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक यांची वैयक्तिक भेट घेत सर्वांचे त्यांनी आभार मानले.