सेनापती कापशी (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चालू गळीत हंगामात ९ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली. कारखान्याच्या सातव्या गळीताच्या बॉयलर अग्निप्रदीपन व इथेनॉल निर्मिती हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
नाविद मुश्रीफ पुढे म्हणाले की, ९ लाख टन ऊस गाळपासह या हंगामात सहवीज प्रकल्पातून ११ कोटी युनिट वीजनिर्मिती करण्याचा संकल्प आहे. इथेनॉल प्रकल्पामध्ये इथेनॉल व रेक्टिफाईड स्पिरिट, असे एकूण १ कोटी ४० लाख लिटर्स निर्मितीचा संकल्प आहे. कारखान्याचे व्यवस्थापन आर्थिक नियोजन करीत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी, तोडणी- वाहतुकीची बिले, सभासद साखर वेळेवर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांना जादा ऊस उत्पादनाबाबत सातत्याने मार्गदर्शन व ऊस विकासाच्या विविध योजनाही राबविल्या जात आहेत.
एकरकमी एफआरपी आणि वेजबोर्डचीही गोड बातमी
नाविद मुश्रीफ म्हणाले की, या हंगामाची एकरकमी एफआरपी देणारच आहोत. तसेच कामगारांच्या वेजबोर्डची गोड बातमीही कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या हंगामाच्या गळीत शुभारंभात मंगळवारी (दि.१९) जाहीर करतील.
स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी कारखान्याच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सर्व संचालक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.