कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ३० जून रोजी दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासन यांनी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रुपये ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनुदान वितरीत करण्यासंबंधीची सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन असणार असून ती साधारणपणे येत्या दोन आठवड्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याला कळविली जाणार आहे. जिल्हा पातळीवर प्रत्येक जिल्ह्याचे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा असणार आहे. प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मा.जिल्हाधिकारी या सर्व अंमलबजावणीचे प्रमुख असणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा पत्ता खालील प्रमाणे आहे…

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, स्वराज्य भवन, नागाळा पार्क, कोल्हापूर, दूरध्वनी क्र. ०२३१- २६५९२३२, टोल फ्री क्र. १०७७ याच्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.