मुंबई (प्रतिनिधी) : ‘शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायला तयार आहे.’ या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा छगन भुजबळ यांनी आपल्या शैलीत चांगलाच समाचार घेतला. राऊतांनी विचार करून बोलायला हवे होते, असेही त्यांनी राऊतांना सुनावले.

शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे. संजय राऊत यांनी जेही वक्तव्य केले ते योग्य नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राहायचे का नाही, याबाबत त्यांचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कळवावा. चर्चेने एकत्र बसून प्रश्न मिटला असता, हे सांगायलाही भुजबळ विसरले नाहीत.

भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजिबात काळजी करीत नाही. विरोधी पक्षात बसून लढण्याची आम्हाला चांगली सवय आहे. आमची तयारी आहे. त्यांना जे काही सांगायचे ते त्यांनी शरद पवार यांना सांगितले पाहिजे. भुजबळ यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेबद्दल मी काहीही बोलणार नाही. ते आमचे सत्तेतील सहयोगी आहेत. राष्ट्रवादी आमदारांची भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची मागणी आमदारांनी केली का? याविषयी ते म्हणाले, भाजपसोबत राष्ट्रवादीने जावे, अशी कोणतीही मागणी आमच्या आमदारांची नाही.

भुजबळ म्हणाले की, संजय राऊत यांनी जे विधान केले त्याचा त्यांनी विचार करायला हवा होता. पक्षात एकमेकांवर कुरघोडी केली जाते, ती चालतेच, आज जो प्रसंग उभा आहे त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, हा प्रश्न चर्चा करुन मिटू शकला असता. महाविकास आघाडीकडे त्यांनी त्यांची भूमिका कळवावी. वेगळी वाट धरायची असेल तर शिवसेना धरु शकते.