मुंबई (प्रतिनिधी) : संजय राऊत एवढे मोठे नेते नाहीयेत की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ. राज्यपाल हे संविधानानुसार प्रमुख आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. आम्ही गेलो की ते (राज्यपाल) भाजपचे नेते असतात आणि तुम्ही कंबरेमध्ये वाकून त्यांना नमस्कार करता तेव्हा ते कोणाचे नेते असतात?,  असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावे, या मागणीसाठी आज (बुधवार)  भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.   

बदली घोटाळा प्रकरण या प्रकरणावर बोलणे मुख्यमंत्र्यांना अडचणीचे ठरु शकते त्यांना माहिती आहे की या प्रकरणावर बोललो, तर या प्रकरणाचा तपास करावा लागेल,  तपास करण्याचे आदेश द्यावे लागतील. हे सर्व त्यांना नाही करायचं आहे. आपलं सरकार वाचवण्यासाठी,  हफ्तेखोरीला पाठीशी घालण्यासाठी हे केले जात आहे.

संजय राऊत सरकारी व्यक्ती नाहीत . त्यांचे वक्तव्य हे अधिकृत वक्तव्य मानता येणार नाही. त्यामुळेच सरकारकडून कोण बोलत आहे ते सांगवं? आणि का बोलत नाहीत ते ही सांगावं, अशी मागणी फडणवीस यांनी केली.