कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याची जनपंचायत शिवार संवाद कार्यक्रम आटोपून शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे थेरगाव (ता.शाहूवाडी) कडे चालले होते. त्यावेळी रस्त्याच्या बाजूच्या शेतात काम करीत असलेले काही शेतकरी व महिला  बांधावर न्याहारी करत होत्या. राजेने गाडी थांबवत त्यांच्यासोबत न्याहारीचा आस्वाद घेतला.  

 

घाटगे यांनी शिवारात असलेल्या आंब्याच्या झाडाखाली मांडी ठोकली. त्यांच्यातीलच भाजी भाकरी हातावर घेतली व ती खात खात शेतकऱ्यांशी संवाद साधणे सुरू केले. शेतातील कामाच्या धावपळीमुळे आम्ही आपल्या कार्यक्रमासाठी येऊ शकलो नाही. मात्र, आमच्या अडचणी तुम्ही ऐकून घ्या, असे साकडे शेतकऱ्यांनी यावेळी राजेंना घातले. यावेळी या शेतकऱ्यांना विश्वास देताना राजे म्हणाले की, आपण शिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा पिंजून काढत असून सरकारला शेतकऱ्यांना  जाहीर केलेली मदत देण्यास भाग पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

राजे आपल्यासोबत झाडाखाली मांडीला मांडी लावून आपल्यातीलच भाजी भाकरी खात आहेत हे पाहून या शेतकऱ्यांना झालेला आनंद व आश्चर्य ते लपवू शकले नाहीत. याचीच चर्चा दिवसभर सातवे परिसरात सुरु होती.