कागल (प्रतिनिधी) : राज्य सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुणांसाठी निराशजनक आहे, अशी खरमरीत टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली.

ते म्हणाले की, दोन लाख रुपयांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसह राज्य शासनाने जाहीर केलेल्या म. फुले कर्जमुक्ती योजनेतील काही शेतकरी वंचित आहेत. लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिले माफ करण्याची मागणी होत आहे. कृषी वीजबिल माफी सुद्धा फसवी आहे. या अधिवेशनामध्ये याबाबत राज्य सरकार तरतूद करेल अशी अपेक्षा होती. मात्र या बाबत कोणतीही तरतूद न करता राज्य शासनाने स्वतः दिलेला शब्द फिरवला आहे. त्यांनी काढलेल्या जी.आर.च्या आदेशाला रद्दीची टोपली दाखवली आहे.

आज जागतिक महिला दिनी झालेल्या या अधिवेशनात महिला सक्षमीकरणासाठी कोणत्याही प्रकारची नवीन घोषणा करण्यात आलेली नाही. हे सुद्धा निंदनीय आहे. कोरोनामुळे रोजगार गेलेल्या तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची अपेक्षा राज्य सरकारकडून होती. मात्र ती सुद्धा फोल ठरली आहे.  विशेष म्हणजे वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधात केंद्र शासनाकडे बोट दाखवणाऱ्या राज्य सरकारने राज्याचा कोणताही कर कमी करण्याबाबत सूतोवाच केलेले नाही. त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचे दर वाढलेले आहेत याला राज्य सरकार जबाबदार आहे

त्यामुळे महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम  राज्य सरकार करीत आहे.त्यामुळे एकंदरीतच हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता शेतकरी महिला तरुण अशा सर्वच घटकांना निराश करणारा असा आहे.