मुंबई (प्रतिनिधी) : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. आपल्या फेर नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपये मागितले, असा दावा वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात केला केला आहे. परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनीही आपणाला कंत्राटदारांकडून वसुली करण्यास सांगितल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

वाझे यांनी पत्रात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२० मध्ये देशमुख यांनी मला सह्याद्री अतिथीगृहावर बोलावून शहरातील १, ६५० रेस्टॉरंट आणि बार व्यावसायिकांकडून लाखोंची वसुली करण्यास सांगितलं होतं. त्या वेळी मी हे आपल्या क्षमतेपलिकडे असल्याचं त्यांना सांगितलं होतं. जानेवारी २०२१ मध्ये आपण गृहमंत्री देशमुख यांना त्यांच्या शासकीय बंगल्यावर भेटलो होतो. तिथे त्यांचे पीए कुंदन हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी मला १६५० बार आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांकडून प्रत्येकी ३ ते ३.५ लाख रुपयांची वसुली करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटलो होतो आणि त्यांच्याकडे संशय व्यक्त केला होता. कुठल्या तरी खोट्या वादात अडकू अशी भीती व्यक्त केली होती. त्यांनी मला धीर दिला आणि कुणाकडूनही आणि कुणासाठीही अवैध पैसे वसुलीत सहभागी न होण्यास सांगितलं होतं.

या पत्रात वाझे यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केला. ते म्हणतात, जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये मंत्री अनिल परब यांनी डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांआधी त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावलं होतं. सुरूवातीला SBUTबद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितलं. त्यानंतर विश्वस्तांना घेऊन येण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर चौकशी थांबवण्यासाठी परब यांनी SBUT ५० कोटी रुपये मागितले होते. हे काम करण्यास आपण असमर्थता दर्शवली. कारण आपल्याला SBUTबद्दल माहिती नव्हती. त्याचबरोबर चौकशीवरही कोणतंही नियंत्रण नव्हतं. जानेवारी २०२१ मध्ये परब यांनी आपल्याला पुन्हा शासकीय बंगल्यावर बोलावलं आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या यादीतील काही ठेकेदारांची चौकशी करून अशा ५० ठेकेदारांकडून २ कोटी रुपये वसूल करण्यास त्यांनी सांगितलं होतं. अज्ञात तक्रारींच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. ठेकेदारांविरोधातील तक्रारींबाबत गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने केलेल्या तपासातून काहीही निष्पन्न झालं नाही.