औरंगाबाद (प्रतिनिधी) : आम्हाला शिवजयंती साजरी करू दिली नाही. पण पोहरागडावरती संजय राठोड यांच्या समर्थकांची हजारोंच्या संख्येने गर्दी झाली. हेच का समसमान वाटप आता कारवाई कोणावर ?, असा सवाल पूनम राऊत या शिवप्रेमी महिलेने केला आहे.  

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नांव समोर आलेले शिवसेनेचे वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांनी कुटुंबासह आज (मंगळवार) पोहरादेवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी कोरोना नियमांचा फज्जा उडवला. यावर शिवप्रेमी महिलेने ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले होते. त्यानंतर ठाकरे सरकारवर शिवभक्तांनी टीका केली होती. शिवजयंतीला १०० जणांपेक्षा जास्त गर्दी करायची नाही, सामाजिक कार्यक्रम करायचे नाहीत. या नियमांमुळे विरोधी पक्षानेही संताप व्यक्त केला होता.

दरम्यान, संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आज मौन सोडले. त्यांनी विरोधकांकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. माझी बदनामी थांबविण्याचे आवाहन त्यांना केले. माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्थ करण्याचा हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी विरोधकांवर केला.