कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करण्यासाठी शहरातील सर्वच रस्त्यांचे काम बेजबाबदारपणे निकृष्ट न करता यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून दर्जेदार रस्ते करण्यात यावेत. यासाठी पक्षहीन विश्वास कमिटी नेमून त्यांच्यामार्फत तुम्ही संबंधित रस्त्यांच्या कामासंदर्भात माहिती घ्यावी. अशी मागणी सेवाव्रत प्रतिष्ठान आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की गंगावेश ते शिवाजी पुल दरम्यानचा रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, रेगेटिकटी येथील रस्ता करण्यापूर्वी येथील पाण्याची गळती काढणे गरजेचे होते. तसे न करता रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच पुन्हा रस्त्याची खुदाई करण्यात आली. त्यामुळे प्रशासन आणि ठेकेदार यांचे बेजबाबदारपणा निदर्शनास आला. तरी कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करण्यासाठी शहरातील सर्वच रस्त्यांचे काम आपण स्वतः लक्ष घालून ते दर्जेदार करुन घ्यावेत. अशी मागणी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे बंडा साळुंखे, अनिल कोडोलीकर, प्रमोद सावंत, संजय साडविलकर, अवधूत भाटे, विराज पाटील, आकाश उंचाळे, मनोहर सौरभ, रेखा दुधाणे, निलांगी पाटील यांच्यासह हिंदुत्ववादी, सेवाव्रत प्रतिष्ठान संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.