मुंबई  (प्रतिनिधी) : कोरोना काळातील थकीत वीजबिले वसुलीचे आदेश राज्य सरकारने महावितरणाला दिले आहेत. यावर अनेक राजकीय नेते आणि पक्षांनी  तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  ऊर्जामंत्र्यांनी आपला शब्द फिरवला, अशी टीका विरोधकांकडून होत असताना  राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार  यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.

आमदार रोहित पवार  यांनी म्हटले आहे की, वाढीव वीजबिलांबाबत शाहनिशा करण्याची गरज आहे.  वाढीव वीजबिल कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढ्याच बिलाबाबत सरसकट धोरण आखता येईल का ?, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कोरोनाकाळात वीजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चार पट नक्कीच झाला नसेल. ग्राहकांना आलेल्या बीलाचा प्रत्यक्ष वापर कसा झाला याचा रिपोर्ट एमएसईबीने काढलाय का,  असा सवाल  करून त्यांनी सर्वसामान्य ग्राहकांचा आवाज ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले.