मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या समितीचे शासनाने पुनर्गठन केले असून, या समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा पुन्हा राजेश क्षीरसागर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हे पद कॅबिनेट मंत्री दर्जाच्या तोडीचे असून क्षीरसागर यांची प्रथम १७ जून २०१९ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा या समितीचे कार्यकारी अध्यक्षपद क्षीरसागर यांचेकडेच कायम ठेवण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य नियोजन मंडळ वगळता सर्व समित्या शासनाने बरखास्त केल्या होत्या. राज्य नियोजन मंडळ, मुंबई यांचे शासनाने ९ मार्च रोजीच्या शासन आदेशान्वये पुनर्गठन केले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीच्या ‘कार्यकारी अध्यक्ष’ पदावर राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. या समितीमध्ये उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह समिती सदस्य म्हणून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह शासकीय अधिकारी काम पाहतील.

यावर प्रतिक्रिया देताना राजेश क्षीरसागर यांनी म्हटले की, राज्य नियोजन मंडळ, नियोजन विभाग, महाराष्ट्र राज्य हा मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील एक महत्वपूर्ण विभाग असून, नियोजन आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे राज्य आणि जिल्हा पातळीवर पंचवार्षिक योजना आणि वार्षिक योजना तयार करण्याचे काम या विभागाचे प्रमुख कार्य आहे. यासह मानव विकासावर आधारित योजना राबविणे याकरिता ४०० कोटींच्या निधी वितरणाचे अधिकार पुढील काळात मिळणार आहेत. या माध्यमातून राज्याचा विकास साधण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.