कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज (गुरुवार) पूर्ण क्षमतेने किरणोत्सव पार पडला. आज किरणोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी किरणं देवीच्या चेहऱ्यावर पोहचली. किरणांनी जणू अंबाबाईच्या मूर्तीवर अभिषेकच घातला. त्यामुळे देवीची मूर्ती सूर्यकिरणांनी न्हाऊन निघाली.

किरणोत्सव हा करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील अनोखा सोहळा. आज सूर्यकिरणे सायंकाळी ५ वा. महाद्वार कमानीजवळ, सहा मिनटांनी गरुड मंडपात, सतरा मिनिटांनी चौथऱ्यापर्यंत, ३२ मिनिटांनी कासव चौकात तसेच ३७ मिनिटांनी पितळी उंबरा, ४३ मिनिटांनी कटांजन आणि ५ वाजून ४४ मिनिटांनी सूर्यकिरणांनी अंबाबाईची मूर्ती उजळून निघाली.