जालना (प्रतिनिधी) : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत धक्कादायक वक्तव्य केले आहे. शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. याच देशांनी सीएएच्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकवलंं असून भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन देखील दानवे यांनी केले आहे.

जालना जिल्ह्यातील कोलते टाकली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे असल्याचेही सांगायला देखील दानवे विसरले नाहीत. नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आजचा १४ वा दिवस आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने काही प्रमाणात माघार घेण्याचे संकेत दिले होते.