कोल्हापूर (प्रतिनिधी) : सदाभाऊ खोत यांच्या कितीतरी क्लिप आमच्याकडे आहेत. मी मेलो तरी शेतकरी संघटना सोडणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही, असे ते त्यामध्ये म्हणाले होते, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.
ऐन दिवाळीत दोन दिवसांपासून खोत आणि शेट्टी यांच्यात आरोप- प्रत्यारोपांचे फटके फुटत आहेत. खोत यांच्या आरोपांना उत्तर देताना शेट्टी म्हणाले की, सदाभाऊ खोत फालतू आहे. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन मी वेळ वाया घालवणार नाही. खोत यांनी कडकनाथ घोटाळ्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. कालपर्यंत ज्यांना खांद्यावर घेऊन नाचावे असे वाटत होते, आज त्यांचे बोलणे कोंबड्यासारखे वाटत आहे. त्यांची आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ते संघटनेत असताना मेलो तरी शेतकरी संघटना सोडणार नाही, असे म्हणत. त्यांच्या अनेक क्लिप्स आमच्याकडे आहेत.