मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रातील लसीकरण मोहीम आणि आरोग्य व्यवस्थेवर टीका केली होती.  राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे  राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दरम्यान,  हर्षवर्धन यांच्या आरोपांना राज्याचे आरोग्य मंत्री  राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.

मंत्री टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४.५ लाख आहे. मृतांची संख्या ५७ हजार, एकूण बाधितांची संख्या ३० लाख आहे. अशी परिस्थिती असताना आम्हाला फक्त ७.५ लाख लसी दिल्या आहेत. सर्व पद्धतीने केंद्राशी समन्वय ठेवला जात आहे. ७ दिवसाला ४० लाख लसीचे डोस लागतातच. त्यामुळे आठवड्याला ४० लाख आणि महिन्याला १ कोटी ६० लाख डोस मिळायला हवेत. तरच राज्यातील लसीकरण मोहीम व्यवस्थित सुरू राहू शकेल. 

आज महाराष्ट्रात सातारा, सांगली, पनवेलला लसीकरण बंद पडले आहे. बुलढाण्यात फक्त आजच्या दिवसाचा साठा आहे. आपण लसीकरण केंद्र देखील वाढवले आहेत. हर्षवर्धन यांच्या बोलण्यावरून जाणवत नाहीये की त्यांना जाणीवपूर्वक विरोध करायचा आहे. पण देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का?, असा सवाल त्यांनी केला. मला कुणावर आरोप करायचे नाहीत. राज्यातले सर्व कर्मचारी, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. आम्ही सगळ्या प्रकारे लसींची मागणी केली आहे, दर आठवड्याला ४० लाख लसी द्याव्यात, अशी  आमची मागणी  असल्याचे टोपे यांनी सांगितले.