मुंबई (प्रतिनिधी) : खाजगी क्षेत्र व अशासकीय संस्थाच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) संस्थेची स्थापना राज्य शासनाने केली आहे. आज संस्थेच्या  नियामक मंडळात उपाध्यक्ष पदी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सर्वात मोठी असून, देशाच्या सकल उत्पन्नामध्ये (जीडीपी) राज्याचा वाटा १५ टक्के आहे. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी भारत सरकारमार्फत कार्यरत असलेल्या नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यामध्येही अशा संस्थेची स्थापना करण्याबाबतच्या सूचना नीति आयोगाकडून देण्यात आल्या. त्यानुसार नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खाजगी क्षेत्र व अशासकीय संस्थाच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यास शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली.

“मित्र” संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी पदरचना यापूर्वी करण्यात आली आहे.

राजेश क्षीरसागर यांनी, राज्याचा विकास साधण्यासाठी त्यातील मूळ उद्देश साध्य करण्याची मोठी जबाबदारी आहे. या संस्थेच्या माध्यमातून अभ्यासपूर्वक काम करून राज्याच्या जलद व सर्वसमावेशक विकासाचा भाग होणे ही माझ्यासाठी मोठी संधी असणार आहे. नियोजन विभागाच्या कामकाजाशी संलग्न अशी मित्र या संस्थेची कार्यपद्धती असल्याने मित्र या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने मला माझी कार्यक्षमता सिद्ध करण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

यासह नियोजन विभागातील कार्यपद्धतीच्या अनुभवावर ही जबाबदारी निभावणे मला सोयीस्कर होणार आहे. संस्थेच्या झालेल्या नियुक्तीच्या माध्यमातून राज्याचा विकास साध्य करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा, विश्वासही त्यांनी व्यक्त केला.