कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या अनास्थेमुळे स्वप्नील लोणकरच्या रूपाने महाराष्ट्र एका उद्योन्मुख अधिका-यास मुकला आहे. असे उद्गार शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी काढले. ते फुरसुंगी येथे लोणकर कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीवेळी बोलत होते.

यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले की,  स्वप्नील यांचा पिंड समाजसेवेचा होता. त्यांनी स्थापन केलेल्या पंचमुखी फाउंडेशनच्या सेवाभावी संस्थेचे काम त्यांचे स्मरण म्हणून  त्यांच्या पश्चात अव्याहतपणे चालू ठेवून त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करूया. मात्र,  स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व तरुणांनी नोकरी या केवळ एकमेव पर्यायाचा  विचार न करता व्यवसायाचा सुद्धा विचार करावा. अशा तरुणांचा पाठीशी राजकीय गटतट बाजूला ठेवून राजर्षी छ. शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून मी ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांनी, तरुण मुलांकडे आम्ही आई-वडील उतारवयातील आधार म्हणून पाहत असतो. या मुलांच्या बरोबर आम्हीही काही स्वप्ने पाहिलेली असतात. याचा विचार करून तरुणांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये. अशी मी तमाम तरूणांना हात जोडून विनंती करतो. अशा भावना व्यक्त केल्या.

स्वप्नीलची आई छाया यांनी, सरकार आणखी किती स्वप्नील गमावण्याची वाट बघत आहे. असा सवाल उपस्थित करून सरकारने अशा स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना ठोस धोरणातून शब्द द्यावा. अशी अपेक्षा व्यक्त केली.