मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या ४८ तासांत कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. बहुतांश भागात ढगाळ हवामानामुळे ऐन हिवाळ्यात उकाडा, इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात दोन दिवसांपासून थंडी जाणवत असली तरी दुपारी उकाडा होताना दिसत आहे. वातावरणात होणाऱ्या झपाट्याच्या बदलांमुळे जनजीवनावर प्रचंड परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, बदलत्या हवामानामुळे रबी पीकही धोक्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे प्रथमच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कमालीचा उकाडा जाणवत आहे. सतत ढगाळ वातावरणामुळे हिवाळ्यात उकाडा जाणवतोय. अशा विचित्र वातावरणात एन्फ्लूएन्झा या विषाणूचा प्रभाव वाढलाय. अजून तीन दिवस वातावरण असंच ढगाळ राहील असा अंदाज आहे. मंदौस चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने बाष्पयुक्त वारे वाहात आहेत. त्यातच आता अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. दिवसा कडक उकाडा आणि रात्री थंडी अशा वातावरणामुळे एन्फ्लुएन्झा आणि पॅरा एन्फ्लूएन्झा या विषाणूंचा प्रादूर्भाव वाढून नागरिक आजारी पडत आहेत. श्वसनाचे आजार वाढलेत.

१३ डिसेंबरच्या आसपास बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने चेन्नई आणि तमिळनाडूच्या अनेक भागांमध्ये १५ डिसेंबरपर्यंत आणखी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर, कांचीपुरम जिल्ह्यातील शाळांना तसेच तिरुवल्लूर आणि उथुकोट्टई तालुक्यांसह काही भागात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने सांगितले की, तामिळनाडू आणि केरळमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी कमाल तापमान २७.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा चार अंशांनी जास्त आहे. त्याचवेळी, दिल्लीचे किमान तापमान ८.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्य आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दिल्लीत धुक्यासह आकाश स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.