नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरएसएस सोडून या देशात सर्वजण दहशतवादी आहेत का?, तुम्ही देशाच्या पाठीचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांचीच ही दुरवस्था करत आहात, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला. सोबतच दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यंदाच्या वर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरही सडकून टीका केली.

ते म्हणाले, सरकार किल्लाबंदी का करत आहे? सरकार शेतकऱ्यांना घाबरते का? शेतकरी देशाची ताकद आहेत. त्यांना दाबणे, मारणे आणि धमकावणे सरकारचे काम नाही. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचे काम करावे. शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा दिला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन करणे हे देशासाठी योग्य नाही.

जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. तुमचे काम आहे त्यांच्या हिताचा विचार करणे. या एक टक्के लोकसंख्येसाठी तुम्ही देश विकू शकत नाही. मी शेतकऱ्यांना चांगलं ओळखतो ते कुठंही जाणार नाहीत अखेर एक दिवस सरकारलाच मागे हटावे लागेल. त्यापेक्षा आताच माघार घ्या. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवर टाळाटाळ करण्याची गरज नसून पारदर्शी आणि स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आता आली आहे.