नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागील काही महिन्यांपासून भाजपप्रणीत एनडीएमधून  मित्रपक्ष  बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. आता शिवसेना, शिरोमणी अकाली दलापाठोपाठ आसाममधील मित्रपक्ष बोडोलँड पीपल्स फ्रंटने भाजपची साथ सोडत काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. याबाबत पक्षाचे अध्यक्ष हगरामा मोहिलारी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे  ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसला आहे.    

आसाममध्ये २७ मार्च, १ आणि ६ एप्रिल रोजी  विधानसभेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, गेल्या ५ वर्षांपासून भाजपसोबत सत्तेत असलेल्या बीपीएफने काँग्रेसशी   हातमिळवणी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो. २००६ या पक्षाने एका पट्ट्यातील १२ पैकी १२ जागा जिंकून आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. शांतता, एकता आणि विकासासाठी काम करण्यासाठी बीपीएफने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपसोबत आता आमची मैत्री किंवा युती राहिलेली नाही, असे मोहिलारी यांनी  म्हटले आहे.