कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्याच्या निषेधार्थ आज (शनिवार) कोल्हापुरात प्रदेश महिला काँग्रेसतर्फे मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन केले.

केंद्रातील भाजप सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून या पुरस्काराला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव दिलंय. मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव हे गांधी घराण्याच्या आकसापोटी बदलले असल्याचा आरोप प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी करत कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीच्या आवारात इथं मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

या आंदोलनात संगीता तिवारी, उज्ज्वला साळवे, सरलाताई पाटील, सुप्रिया साळोखे, संध्या घोटणे, सुलोचना नायकवडी, चंदा बेलेकर, अपर्णा पाटील, उदयानी साळोखे, वैशाली महाडिक यांच्यासह कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.