मुंबई (प्रतिनिधी) : बेताल विधाने करणाऱ्या राज्यपालांना न हटवल्यास राज्य बंद यासह अन्य प्रकारे उग्र आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, भाजप आणि शिंदे गटावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. सीमावादाच्या प्रश्नावरून कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला.

येत्या दोन चार दिवसात राज्यपालांचा विषय तडीस न्यावा लागेल. जे महाराष्ट्र प्रेमी, फुले प्रेमी, आंबडेकर प्रेमी आणि छत्रपती प्रेमी आहेत. त्यांना उभे राहावे लागेल. शिवाजी महाराज नसते तर कोश्यारी कुठे असते? सावित्रीबाई फुले नसत्या तर महिला शिक्षणाचे काय झाले असते? याचे साधे भान राज्यपालांना राहिले नाही. हे आता अति झाले. ज्यांना आगा पिछा नाही असे लोक राज्यपाल पदावर बसवले गेले आहेत, असा हल्ला ठाकरे यांनी चढवला.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा अपमान केला जात आहे. खोके सरकार आल्यापासून उद्योग बाहेर जात आहेत. हे कमी की काय आता राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्राचा अवमान करत आहे. त्यांनी आधी सावित्रीबाई फुलेंवर टीका केली. मुंबई आणि ठाणेकरांवर टीका केली. आता त्यांनी आमचे दैवत शिवाजी महाराजांवर टीका केली आहे. बाप हा बाप असतो. तो जुना असतो का? त्यामुळे राज्यपालांना हटवले पाहिजे, जे राज्यपाल येतात ते विचारधारा घेऊन येतात. कोश्यारी जे म्हणाले ती भाजपची विचारधारा आहे का? सर्वांनी एकत्र यावे. पक्ष बाजूला ठेवा, असे ते म्हणाले.

राज्याच्या अस्मितेसाठी एकत्र येऊन बोलले पाहिजे. दोन चार दिवस वाट पाहू. हे पार्सल परत नाही गेले तर आम्हाला काही तरी करावे लागेल. महाराष्ट्र बंद किंवा विराट मोर्चा काढावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. आमच्याकडे मुख्यमंत्री पैचान कोन सारखे आहेत. उपमुख्यमंत्रीच बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांमध्ये बोलण्याची हिंमत नाही, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.