नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. एमपीएससीच्या परीक्षेवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा महाराष्ट्र सरकारने रद्द केली. हे करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला. उर्वरित ८५ टक्के जनतेचं काय ? असा सवाल त्यांनी आज (सोमवार) दिल्लीत पत्रकार परिषदेत केला.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली. त्यानंतर ठाकरे सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यावरूनच आंबेडकरांनी टीका केली. ते म्हणाले की, मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारने विश्वास दिला नाही. महाविकासआघाडीचे सरकार अतिरेक करत आहे. राज्य सरकार केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांची अंमलबजावणी करत नाही. तर दुसऱ्या बाजूला वारकरी संप्रदायाने सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्रात मंदिरे उघडली जात नाहीत.