कागल (प्रतिनिधी) : सत्ता हे साध्य नव्हे तर गोरगरिबांच्या कल्याणाचे  साधन आहे. असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच सत्ता ही गोरगरिबांसाठीच असते. तिचा लाभ त्यांच्या पदरात पडण्यासाठी हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी करा, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. ते कागलमध्ये निराधार योजनेच्या १५० लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे वाटपावेळी बोलत होते.

आ. मुश्रीफ म्हणाले, १९८० साली तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुलेनी ही योजना सुरू केली होती. त्यावेळी दरमहा अवघे रुपये पेन्शन होती. विशेष सहाय्य खाते माझ्याकडे येताच त्यातील जाचक अटी दूर करून योजनेमध्ये अमुलाग्र बदल केला. येत्या काळात या योजनेची उत्पन्न मर्यादेची अट २० हजारावरून तीस हजार रुपये करणे, उत्पन्नाचा दाखला वर्षाला देण्याऐवजी तीन वर्षांनी देणे, लाभार्थ्यांची मुले २५ वर्षांची झाल्यानंतर लाभ बंद होण्याची तरतूद काढून टाकणे, तसेच महिन्याला एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार करणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी रमेश माळी, शशिकांत खोत, राजू आमते, सदाशिव तुकान, बाळासाहेब दाईंगडे, नितीन दिंडे, प्रमोद पाटील, असलम काझी, सुनील माळी, प्रवीण काळबर, अमित पिष्टे, बच्चन कांबळे आदी उपस्थित होते.