मुंबई (प्रतिनिधी) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता भाजप नेत्यांविरुद्ध पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. याप्रकरणात बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या ७ नेत्यांविरुद्ध वाशीम शहर व मानोरा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी या दोन्ही तक्रारी चौकशीत ठेवल्या आहेत.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबासह बंजारा समाजाची बदनामी होत आहे, अशी तक्रार अखिल बंजारा परिषदेचे अध्यक्ष श्याम राठोड यांनी केली होती.  या प्रकरणी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, सुधीर मुनगंटीवार, अतुल भातखळकर, आशिष शेलार, शांता चव्हाण यांच्यासह माध्यमावर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, काही वृत्तवाहित्यांकडून बदनामीचे प्रकार होत आहेत. या प्रकरणात मुलगी, तिचे कुटुंबीय व संपूर्ण समाजाची मानहानी झाली. त्यामुळे भाजप नेत्यांसह प्रसारमाध्यमांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.