मुंबई (प्रतिनिधी) : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी कर्नाटकाचा मुंबईवरही हक्क असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. यावर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठवली. आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून सवदी यांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे.  कानडी सरकारचा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद संपवावाच लागेल, असे अग्रलेखात म्हटले आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मणरावांचे म्हणणे बरोबर आहे. महाराष्ट्राला कर्नाटकची अर्धा इंचही जमीन नको आहे. महाजन अहवालानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला भूभाग व त्याशिवाय कर्नाटकात जोरजबरदस्तीने कोंबलेला मराठी भाग, जो महाराष्ट्राच्या हक्काचा आहे, तेवढाच तुकडा महाराष्ट्राला हवा आहे बेळगावची लढाई त्यासाठीच सुरु आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

सवदींसारख्या बिनडोक लोकांनी सीमा लढ्याचा इतिहास जरा समजून घेतला पाहिजे. ते पाळण्यातली गोधडी भिजवत होते त्याआधीपासून बेळगावसह सीमा भागातील मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी लढत आहेत. हे प्रकरण न्यायालयात पडून असताना बेळगावसह सीमा भागातून मराठी भाषा, संस्कृतीच्या खुणा उखडून टाकण्याचा चंग कानडी सरकारने बांधला आहे. हा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद आहे. तो संपवावाच लागेल, असा हल्लाबोल  अग्रलेखातून करण्यात आला आहे.