कोल्हापूर (प्रतिनिधी) : बालिंगा पंपिग स्टेशनवरुन पाणी पुरवठयाचे योग्य नियोजन करा, अनियमीतता निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्या तसेच पाईप लाईनचे व उपसाकेंद्रा जवळील लिकेज काढण्याचे तात्काळ नियोजन करा, अशी सूचना स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी आज झालेल्या पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत केली.

सचिन पाटील म्हणाले की, कोल्हापूर  शहरात नागरिकांना पुरवठा करण्यात येत असलेल्या बालिंगा पंपिग स्टेशनवरुन पाणी पुरवठयामध्ये गेले पाच ते सहा दिवस अपुरा व अनियमीत पाणी पुरवठा होत आहे. अभियंते आणि चावीवाले फोन उचलत नाहीत. पाईपलाईनचे आणि उपसाकेंद्रा जवळील लिकेज कोणी काढायचे हे आमचे काम आहे काय ? असा सवाल केला.

गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, बालिंगा पाणी उपसाकेंद्र सारखे बंद पडत आहे. पाण्याच्या टाक्या पुर्ण क्षमतेने भरत नाहीत. तक्रार आल्यानंतर संबधीत अभियंता नागरिकाना भेटतात पण कामे पुर्ण केली जात नाहीत.  २५ कोटींची नविन रस्ते करण्याचे काम आता चालू होणार पुन्हा खुदाई करता येणार नाही. अमृत योजने मधील पाईपलाईन टाकण्याचे काम केले आहे. काही कॉलन्यातील नागरिकांना या रस्त्यांमधून चालता येत नसल्याचे सांगितले.

गटनेते सत्यजीत कदम म्हणाले, कावळा नाका येथे पाणी एक थेंब येत नाही. या टाकीसाठी नविन पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे. परंतू अदयापही ही पाण्याची पाईप लाईन सुरु करण्यात आलेली नाही. ती लाईन रात्री सुरु करण्यात यावी. जेनेकरुन कावळा नाका टाकीमध्ये पाणी पडेल.

नगरसेवक भूपाल शेटे म्हणाले, अमृतमधून एकूण बारा पाण्याच्या टाक्या मंजूर आहेत. एक वर्ष होऊन गेले मुदत संपली तरीही एकही टाकीचे काम पुर्ण झालेले नाही. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे अधिकारी, कॉन्ट्र्रक्टर व महानगरपालिकेचे अधिकारी यांचे मध्ये ताळमेळ नसल्यामुळे संपूर्ण शहरातील पाण्याचे टाक्यांचे काम रखडले आहे. लवकरात लवकर कामे पुर्ण करावीत.

यावेळी उपजल अभियंता रामदास गायकवाड, यु.झेड.भेटेकर, सहा.अभियंता जयेश जाधव, कार्यशाळा प्रमुख चेतन शिंदे, कनिष्ठ अभियंता ए.ए.गुजर, अभिलाषा दळवी, प्रिया पाटील, मिलींद पाटील, राजेंद्र हुजरे, मिलींद जाधव, दास ऑफशरचे प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.