मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात लॉकडाउन लावण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यासंबंधी चर्चा नेहमी सुरु असते. निर्बंध अधिक कडक करण्यासंबंधीचे पावले राज्य शासन उचलणारच आहे. त्यादृष्टीने लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे. गर्दी होणाऱ्या सर्व ठिकाणी कठोर निर्बंध आणण्यासाठी नियोजन करत आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

टोपे म्हणाले की, लसीकरण वेगाने सुरु असून हर्ड इम्युनिटी आणण्याचा प्रयत्न आहे. त्यातून रुग्णसंख्या कमी होताना दिसेल. ज्यांनी कटाक्षाने मास्क वापरला आहे, गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टनिसंग ठेवत आहेत, अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत करोना होणार नाही. कोरोना आपल्या तोंडातून निघणाऱ्या शिंतोड्यातून पसरतो. त्यामुळे मास्क घातल्यानंतर आपण संसर्ग पसरवत नाही. परंतु मास्क न घातल्याने मोठ्या पद्दतीने संसर्ग होण्याची भीती असते.  

कोरोना रूग्णांची संख्या अशीच राहणार असेल आणि लोक बेफिक्रीने वागणार असतील, तर निर्बंध अधिक कडक करणे यासंदर्भातील निर्णय घ्यावाच लागेल. नियम पाळा आणि लॉकडाउन टाळा, एवढंच मला सांगायचं आहे, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.