कोल्हापूर (प्रतिनिधी) : छ. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे शिवप्रेमींचे प्रेरणास्थान आहेत. अशा पवित्र किल्ल्यांची नावे काही बार आणि वाईनशॉपला दिली आहेत. अशा गडकिल्ल्यांची नावे ज्याज्या बार आणि वाईन शॉपला दिली आहेत ती त्वरित बदलावीत. अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच यापुढे अशी नावे असलेल्या परमिट रूम आणि वाईन शॉपला परवानगी देऊ नये. शिवदुर्ग संवर्धन आंदोलन संघटनेने गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे केली.

यावेळी, हा निर्णय शासनस्तरावर व्हावा, तसेच आपल्या सर्व गड-किल्ल्यांवर शासनामार्फत दारूबंदी झाली आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळागडावर बियर बार आणि देशी दारूचे दुकान सुरू आहे. ते ताबडतोब बंद व्हावे आणि दारूबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी अशी विनंती ना. देसाई यांच्याकडे करण्यात आली.यावेळी ना. देसाई यांनी, हा अत्यंत चांगला विषय आपण मांडला आहे. लवकरच या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथे घेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी हर्षल सुर्वे, इंद्रजीत सावंत, किरणसिंह चव्हाण, प्रदीप पांडे, विजय दरवान, अर्जुन संकपाळ, विक्रम जगताप, केतन पाटील, अमृता सावेकर, शुभम जाधव, गणेश खोचीकर, प्रिया पाटील, रोहित पानारी आदी उपस्थित होते.