कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना ऑक्टोबर महिन्याचे धान्य वाटप सुरू केले आहे. यासाठी आवश्यक धान्य स्वस्त धान्य दुकानात पोहच करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.

जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ५३ हजार २४२ आहे. त्यांना आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना प्रती कार्ड तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येत आहे. यासाठी आवश्यक तांदूळ, गहू सरकारकडून उपलब्ध झाले आहे. वाटपासाठी सर्व स्वस्त धान्य दुकानात पोहच झाले आहे. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने रेशनच्या धान्याचा आधार असल्याने अपवाद वगळता सर्वच स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी गर्दी दिसत आहे.