पुणे (प्रतिनिधी) :  आता तर नुसती सुरूवात झाली आहे, एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे. पोलीस खात्यातील लोक सामील असतील तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहणार, असा सवाल करत विरोधी पक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या सापडलेली गाडी आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृत्यू प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.  

मनसुख हिरेन प्रकरण अत्यंत गंभीर आहे. माझ्याजवळ काही पुरावे आले. त्यावेळी मी ते सभागृहात मांडले. मात्र, दुर्देवाने त्यावेळी सरकारच्यावतीने केवळ त्यांना पाठीशी घालण्याचे काम सातत्याने झाले. कुठंतरी त्यांची वकिली करण्याचे काम सरकारच्यावतीने करण्यात आले. एनआयएची कारवाई झाली आहे. त्यामध्ये अनेक पुरावे एनआयएला मिळालेले आहेत. कशाप्रकारे हा संपूर्ण गुन्हा घडला आहे?, हेसुद्धा समोर आलेले आहे, असे फडणवीस म्हणाले.