मुंबई (प्रतिनिधी) : ‘मिलिंद नार्वेकर यांची क्षमता काय, कौशल्य काय हे सर्वांना माहीत आहे. तेच आमदारांना आणि नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू देत नाही’ असा थेट आरोप मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी माध्यमांशी बोलताना केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सभोवतालचे वातावरण आणि माणसे लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे. आमचा विठ्ठल चांगला आहे, मात्र त्याच्या अवतीभवती असलेल्या चार-पाच बडव्यांनी त्यांना घेरले आहे. या बडव्यांमुळेच मातोश्री बदनाम होत असल्याची टीका भुयार यांनी केली आहे.

देवेंद्र भुयार हे अजित पवार यांचे समर्थक आहे. मोर्शी या विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ते म्हणाले, नाराज होऊन गेलेले आमदार याच कारणामुळे पक्ष सोडून गेले आहे. काही बडवे मुख्यमंत्र्यांची भेट होऊ होत नाही. त्यांचा वेळ मिळू देत नाही. त्यामागचे प्रमुख कारण हे बडवे आहेत. महाविकास आघाडी सरकारवर आलेले हे संकट लवकरच दूर होईल व सरकार वाचेल. बंड करून गेलेले आमदार दोन-तीन दिवसांत परत येतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.