मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील काही जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. सुदैवाने विद्यार्थी व शिक्षक कोरोनाने संक्रमित झाले नाहीत. आरोग्य विषयक सुचनांचे पालन करूनच नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील. कारण हे विद्यार्थी प्राथमिक विभागातील मुलांपेक्षा अधिक जागरूक व सजग असतात. लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक सुचनांचे पालन करणे तितकेसे सहज शक्य नसल्याने निदान सध्या तरी आम्ही पहिली ते आठवी पर्यंतच्या प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

त्या म्हणाल्या, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षांचे महत्त्व लक्षात घेऊन प्राधान्याने त्यांचा अभ्यास व परीक्षा पद्धतीचा विचार शिक्षण विभाग करत आहे. ज्यामुळे पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण तज्ज्ञांशी विचार विनिमय सुरू आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा या नेहमीच्या पद्धतीनेच परंतु काहीशा उशीरा म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने शिक्षक भरतीवर कोरोनामुळे घातलेली बंदी उठवल्यानंतर आता भरती प्रक्रियेला वेग येणार आहे. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीसाठीच्या दोन हजारांहून अधिक जागांसाठी शिक्षक भरती राबवण्यात येणार असून नववर्षात जानेवारी महिन्यातच संबंधित शिक्षकांची निवडयादी जाहीर करण्यात येईल. कोरोना संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणांमावर वित्तीय उपाययोजना करण्यासाठी शिक्षण सेवक पदभरतीस बंदी घालण्यात आली होती.