मुंबई (प्रतिनिधी) : अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले  रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह सहआरोपी नितीश सारडा आणि फिरोज शेख यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज  उच्च न्यायालयाने आज (सोमवार) फेटाळून लावला. त्यामुळे त्यांचा तुरूंगातील मुक्काम वाढणार आहे.  

अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. आमचे विशेषाधिकार वापरून तातडीचा अंतरिम जामीन देण्याचे प्रकरण नाही. त्यामुळे आरोपी कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकतो. कनिष्ठ न्यायालय चार दिवसांच्या कालावधीत त्यावर निर्णय घेईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.  दरम्यान, दिवाळीची सुटी असल्याने निर्णय जाहीर करण्यासंदर्भात आम्हाला प्रशासकीय पातळीवर मुख्य न्यायमूर्तींची परवानगी घ्यावी लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.