कागल (प्रतिनिधी) : संपूर्ण आयुष्यभर परोपकारी वृत्तीने कार्यरत राहिलो. गोरगरीब कार्यकर्त्यांना जीवापाड जपलं. ज्यांनी-ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, त्यांना कधीही फसवलं नाही, असे प्रतिपादन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले. ते कागल तालुक्यातील करड्याळ इथे विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते. यावेळी, करड्याळ येथील प्राथमिक शाळेसाठी बांधलेल्या पाच शाळा खोल्यांचे उद्घाटन आ. मुश्रीफ आणि माजी आ. संजयबाबा घाटगे. यांच्या हस्ते करण्यात आले.

संजयबाबा घाटगे म्हणाले, मी आणि आ. मुश्रीफ आम्ही दोघांनीही तरुणपणातच स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कारकीर्दीची सुरुवात केली. त्यांचा विचार रुजवण्यासाठी आयुष्यभर लढत राहिलो. परंतु, काहीजणांना ते रुचत नव्हते. त्यांनी काड्या घालण्याचेच काम केले असल्याचे सांगितले.

आ. मुश्रीफ म्हणाले, मी आणि संजयबाबा घाटगे सातत्याने तीस वर्षे एकमेकांशी संघर्ष करीत राहिलो. एका ऐतिहासिक वळणावर आम्ही एकत्र आलो आहोत. संजयबाबांसह त्यांच्या कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला. अडीच वर्षाच्या मंत्रीपदाच्या काळात हजारो कोटींचा निधी मतदारसंघात आणला. परंतु, सत्ताबदलानंतर बिळातून बाहेर पडलेले काहीजण सगळं काही मीच केलं अशा वल्गना करीत फिरत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी, सरपंच विठ्ठल टिपुगडे, उपसरपंच सुरेश गेंगे, शामराव पाटील, दाजीबा कुंभार, शशिकांत पाटील, युवराज आडसूळ, आनंदा कुंभार, पांडुरंग बिरंजे आदी उपस्थित होते.