कोल्हापूर (प्रतिनिधी) : मानसिकता बदलून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी समाज पुढे येईल. त्याचवेळी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि बेटी बढाओ’ अभियानाचे सार्थक होईल. मुलीच खरा आधार आहे. खेळ, शिक्षण आणि राजकारण यात जिल्ह्यातील मुली कुठेही मागे नाहीत, हे सिध्द करुन दाखवले आहे. ‘कर्तुत्वात भारी मुली कोल्हापुरी’ अभियानाची निश्चितपणे राज्यपातळीवर दखल घेतली जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने ११ ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी बढाओ अंतर्गत ‘कर्तुत्वात भारी मुली कोल्हापुरी’ हे घोषवाक्य घेवून फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त महिला व बाल विकास विभागाने कर्तृत्वात भारी… मुली कोल्हापुरी ही टॅग लाईन घेऊन एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. कोल्हापूरच्या मुलींनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळया क्षेत्रात ठसा निर्माण केला आहे. मुलगा, मुलगी एकच असून माणसाच्या मनाने हा बदल स्वीकारल्यास मुलींच्या जन्मदरात वाढ होईल. मुलींच्या जन्मदराबाबत शासकीय आकड्यात गुंतून न पडता मानसिकता बदलायची गरज आहे.

आ. प्रकाश अबिटकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याने नेहमीच नवनवे उपक्रम, कार्यक्रम राबवले आहेत. आंतररराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त महिला व बाल कल्याण विभागाने कर्तृत्वात भारी…मुली कोल्हापुरी हा सुरु केलेला उपक्रम मुलींना प्रेरणा देणारा आहे.

यावेळी नेमबाज तेजस्विनी सावंत, अभिज्ञा पाटील, कुस्तीपटू स्वाती शिंदे, नंदिनी साळुंखे, टेबल टेनिसपटू वैष्णवी सुतार आणि पॅरॉ ऑलंपिकमध्ये यश मिळविलेल्या उज्वला चव्हाण या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.