कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कागल येथील कोगनोळी टोल नाक्यावर नागरीकांना कर्नाटक सरकारने आरटीपीसीआरची सक्ती केली आहे. याच्या विरोधात कागल शहर राष्ट्रवादीने आंदोलन करत सुमारे तासभर हा महामार्ग रोखून धरला.

कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी इथल्या सरकारने आरटीपीसीआरची सक्ती केली आहे. याच्या निषेधार्थ कागल शहर राष्ट्रवादीने रास्तारोको करत निदर्शने केली. यावेळी तणावग्रस्त वातावरण झाल्यामुळे कर्नाटकचे पोलीस महासंचालक, बेळगावचे जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांसह, अधिकारी, पोलिसांचा फौजफाटा कोगनोळी नाक्यावर दाखल झाला होता.

यावेळी राष्ट्रवादीने इथल्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमा ही काय भारत-पाकिस्तान सीमा आहे काय ? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच  येत्या दोन ते तीन दिवसात ही चाचणी बंद न केल्यास महाराष्ट्रातही कर्नाटकाची वाहने येऊ देणार नसल्याचा इशाराही यावेळी कागल शहर राष्ट्रवादीने दिला.

यावेळी उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, कागल पं.स. सभापती रमेश तोडकर, राष्ट्रवादी कागल शहराध्यक्ष संजय चितारी, नगरसेवक आनंदराव पसारे, सौरभ पाटील,सतीश घाडगे,  सागर गुरव आदी उपस्थित होते.