कोल्हापूर  (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपची अवस्था दयनीय झाली असून, पुढील कार्यकाळामध्ये त्या पक्षास जिल्ह्यामध्ये दुर्बिणीमधून शोधण्याची वेळ येईल. मागील पाच वर्षांमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यावर विकासकामांमध्ये अन्याय केला, त्याचे हे त्या पक्षाला मिळालेले फळ आहे. जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या पाण्यापैकी एक थेंबही न अडवणे, खराब रस्ते, शेतकरी व सामान्य माणसाचा विश्वासघात या गोष्टीही भाजपच्या पराभवास जबाबदार आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी भाजपवर खरमरीत टीका केली आहे.

पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीने १५८ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळविली व १, १, ४४६ सदस्य निवडून आले. शिवसेना व काँग्रेस पक्षानेही घवघवीत यश मिळवले आहे. महाविकास आघाडीची संख्या ६० टक्के इतकी होते. भाजप २० टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे.

भाजप ग्रामीणचे अध्यक्ष ‘गिरा तो भी टांग उपर’ या पद्धतीने विधान करीत आहेत. घाटगे यांचा निकालाच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजेच १९ जानेवारी रोजी वाढदिवस होता. आमचे नेते, ना. मुश्रीफ यांनी त्यांचा वाढदिवस आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निर्णयावर त्यांच्यावर टीका करू नका, असा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. कारण, वाढदिवस वर्षातून एक दिवस येत असतो. त्या दिवशी कोणालाही दुःख, यातना, वेदना होऊ नयेत, ही त्यांची भावना होती.

ग्रामपंचायत निकालावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते की, शाहू साखर कारखान्याच्या पट्ट्यातील १५ गावांमध्ये एकाही गावांमध्ये भाजपची सत्ता आली नाही. आजपर्यंत राजे गटाचे प्रभावक्षेत्र होते, त्या ठिकाणी ही अवस्था आणि भा.ज.प.च्या विजयाच्या बाता करता, असेही पत्रकात म्हटले आहे.