कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी होत आहे. ती पुन्हा वाढणार नाही, यासाठी नागरिकांनी गर्दी न करता सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझर यांचा वापर करून नवरात्रोत्सव आणि दसरा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये मार्चपासून लॉकडाऊन सुरू होता. आता शासनाच्या निर्देशानुसार अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. अनलॉकमुळे नागरिकांचे व्यवहार सुरू झाले आहेत. सद्या २०० ते ३०० बाधित रूग्ण सापडत आहेत. २५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. १७ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.

त्यासाठी सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करावा. गर्दी टाळून हे उत्सव साधेपणाने साजरे करावेत. दसरा चौकात साजरा होणाऱ्या पारंपरिक उत्सवासाठीही कमीत, कमी गर्दी करावी असे आवाहन केले.