कळे (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, कोल्हापूर विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार कळे न्यायालयातील तालुका विधीसेवा समितीतर्फे शनिवार (दि. २५) रोजी कळे-खेरीवडे न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे.

यामध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित प्रकरणे, एनआय अॅक्ट चेक बाऊन्स प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, दरखास्त प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँकेची प्रकरणे, ग्रामपंचायतकडील थकीत घरफाळा, पाणीपट्टी वसुली प्रकरणे ही आपापसात सहमतीने तडजोड करून मिटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. लोक अदालतीत दोन्ही बाजूच्या पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी संधी मिळणार असून सामोपचाराने प्रकरणं मिटवल्याने वेळ आणि आर्थिक खर्चाची बचत होणार आहे. तरी सर्व पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रमाणात या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपली प्रकरणे सामोपचाराने मिटवावीत, असे आवाहन अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश विनोद खुळपे यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षकार,  वकील, न्यायालयलीन कर्मचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व नियम पाळले जाणार आहेत. तसेच ज्यांना सहभागी होण्यासाठी काही समस्या असल्यास त्यांच्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स,  व्हॉट्स अॅप सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.